15 दिवसात वीज बिल भरा तरच कृषीपंपाचे कनेक्शन जोडून देणार

  महावितरणकडे वीज विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांची मुदत दिली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 1, 2017, 05:12 PM IST
15 दिवसात वीज बिल भरा तरच कृषीपंपाचे कनेक्शन जोडून देणार title=

मुंबई :  महावितरणकडे वीज विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांची मुदत दिली आहे. 

कृषीपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी १५ दिवसात चालू वीज बिल भरावे आणि थकीत वीज बिल भरण्यासाठी सरकारकडून हप्ते पाडून दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी चालू वीज बिल 15 दिवसात भरले तरच कृषीपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन जोडून दिले जाणार आहे. 

राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांकडे महावितरणचे कृषीपंप वीज बिलापोटी 19 हजार कोटी रुपये थकीत आहेत. ही थकीत रक्कम पाच भागात भरण्याची सवलत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे. सध्या शेतकऱ्यांना तीन महिन्याचे चालू वीज बिल भरायचे आहे. तर 30 हजार रुपयांच्या आतील थकीत वीज बिल भरण्यासाठी पाच हप्ते आणि 30 हजाराच्या वरील थकीत रक्कम भरण्यासाठी 10 हप्ते पाडून दिले जाणार आहेत.

वीज बिल वसुली अन्यायकारक नाही...

शेतकऱ्यांची कृषीपंप वीज बिल वसुली अन्यायकारक नसून शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरावे अशी विनंती ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली आहे. वीज कंपनीची आर्थिक स्थिती जोपर्यंत योग्य होती, तोपर्यंत शेतकऱ्यांना वीज दिली, आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून थकीत रक्कम आल्याशिवाय वीजच खरेदी करता येणार नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

बागायतदार आणि शेतमाल निर्यात करणारे शेतकरीही कृषीपंपाचे वीज बिल भरत नसल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.