मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

Mumbai Water Cut: बंधाऱ्यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 18, 2024, 08:12 PM IST
मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन title=
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण एक दिवस पाणी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पिसे  येथील बांधावरील गेटच्या 32 पैकी एका रबरी ब्लाडर मधे  शनिवार 16 मार्च  रोजी अचानक बिघाड झाल्‍याने पाणी गळती सुरू झाली होती. या ब्लाडर ची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी 31 मीटर पर्यंत खाली आणण्यात आली. यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम सोमवार 18 मार्च  सकाळी8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  युद्धपातळीवर पूर्ण केले. 

यानंतर भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले. असे असले तरी बंधाऱ्याची पाणी पातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार आहे. यासाठी 19 मार्चरोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के पाणीकपात केली जाणार आहे. भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. 

पाण्‍याचा जपून आणि काटकसरीने वापर करा

पिसे बंधाऱ्याच्‍या गेटमधील रबरी ब्लाडर मधून 16 मार्च  रोजी अचानक बिघाड झाला. त्‍यातून पाणी गळती झाली. बंधा-यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले. 18 मार्चला यांत्रिक झडपा दुरूस्‍तीचे काम पूर्ण करण्‍यात आले. भातसा धरणातून पिसे बंधा-यासाठी पाणी सोडण्‍यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे 48 किलोमीटर आहे. त्‍यामुळे पिसे बंधा-यातील पाणी पातळी वाढण्‍यास कालावधी लागणार आहे. बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्‍हणजेच मंगळवार, 19 मार्च रोजी म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे. नागरिकांनी पाण्‍याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.