Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!

Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 30, 2023, 09:56 PM IST
Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल! title=
Mumbai deaths Health News

Mumbai deaths Shocking report : असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये मिळून २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्र ऑगस्ट २०२२ पासून सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांमधून आजवर ३० वर्षावरील सुमारे अडीच लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, जानेवारी २०२३ पासून आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांमार्फत ३० वर्षावरील व्यक्तिंच्या घरोघरी जाऊन उचरक्तदाब तपासणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. निरोगी जीवनशैली व विशेषतः निरोगी हृदयासाठी ३० वर्षांवरील नागरिकांनी नियमितपणे तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जागतिक हृदय दिन व राष्ट्रीय पोषण माह निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हृदयरोग 

जागतिक हृदय दिनानिमित्त माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार, भारतात हृदयरोग संबंधित आजारांनी मृत्यू पावणार्‍या व्यक्तिंचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणी आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २०२२ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. हृदयरोग संबंधित आजार हे या मृत्यूंचे प्रमुख कारण आहे, ही बाब पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे, जेणेकरून ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतील. परिणामी हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. असे केल्यास आजारांची गुंतागुंत टाळण्यासाठी मदत होईल. हृदयरोगाच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यासाठी नागरिकांनी नियमित तपासणी, उपचार व वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी केले आहे. 

हृदय जपा, हृदयास समजून घ्या

जागतिक हृदय दिन (२९ सप्टेंबर) व पोषण आहार माह निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो व लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने जगभरात २९ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो. 'हृदय जपा, हृदयास समजून घ्या' हे यंदाच्या जागतिक हृदय दिनाचे घोषवाक्य आहे. 

याच अनुषंगाने माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १८ ते ६९ वर्ष वयोगटातील नागरिकांचे २०२१ मध्ये डब्ल्यूएचओ स्टेप्स सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणातून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत सुमारे ३४ टक्के नागरिकांना रक्तदाब आणि सुमारे १९ टक्के नागरिकांत मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. प्रत्येक १० पैकी ९ मुंबईकर गरजेपेक्षा कमी फळे व भाज्या खातात. तसेच प्रतिदिन ५ ग्रॅमच्या तुलनेत ८.६ ग्रॅम इतके मिठाचे सेवन करतात, हे प्रमाण खूप जास्त आहे. हृदयाशी संबंधित आजारांसाठी तीन किंवा त्याहून अधिक घटक कारणीभूत असून त्यामध्ये धूम्रपान, तंबाखूचे सेवन, फळे व भाज्या कमी खाणे, अपुरा व्यायाम, जास्त वजन, उच्चरक्तदाब, रक्तातील साखरेची उच्चपातळी यांचा समावेश होतो. ७४ टक्के मुंबईकर हे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये पुरेशा शारीरिक हालचाली करत नाहीत. सुमारे ४६ टक्के मुंबईकरांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे (BMI >25 kg/m2) आणि १२ टक्के मुंबईकरांमध्ये स्थूलता आढळून आली आहे, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शाह यांनी स्पष्ट केले.

आजार टाळण्यासाठी काय कराल?

या सर्व पार्श्वभूमीवर असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या विशेष उपाययोजनांची माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या की, महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये मिळून २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्र ऑगस्ट २०२२ पासून सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये मिळून आजवर ३० वर्षावरील सुमारे अडीच लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांमार्फत ३० वर्षावरील व्यक्तिंच्या घरोघरी जाऊन उचरक्तदाब तपासणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६८ हजार वैद्यकीय दृष्ट्या संशयित नागरिकांना संदर्भित करुन ९ हजार ६०० रुग्णांना उच्च रक्तदाबासाठी निदान व उपचार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महानगरपालिका दवाखाना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना विनामूल्य तपासणी व उपचार देण्यात येत आहेत.  २० हजार रुग्णांना आहारतज्ज्ञांमार्फत उच्च रक्तदाब व मधुमेहाबाबत समुपदेशन सेवा देण्यात येत आहे. निरोगी व आरोग्यदायी जीवनशैलीकरीता १३८ योगा केंद्र सर्व विभागात सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत २६ हजार ७४२ मुंबईकरांनी योगा केंद्रात सहभागी होऊन लाभ घेतला आहे. यासह अन्य अनेक उपक्रमांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे डॉ. शाह यांनी सांगितले.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी-

१. आहारात मीठ, साखर व खाद्यतेलाचे प्रमाण कमी ठेवा.
२. दारू तसेच धूम्रपान, तंबाखू सेवन टाळा.
३. ३० वर्षावरील नागरिकांनी मधुमेह व रक्तदाब आजारांची नियमित तपासणी करावी.
४. नियमित औषधोपचाराने मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
५. दररोज कमीतकमी ३० मिनीट चालणे, नियमित व्यायाम व योगा करा.