मुंबईत कोसळधार! सखल भागात पाणी साचलं, रेल्व, रस्ते वाहतूक मंदावली

हिंदमाता परत जलमय, मुंबई महानगरपालिकेचा दावा फोल

Updated: Jul 5, 2022, 02:26 PM IST
मुंबईत कोसळधार!  सखल भागात पाणी साचलं, रेल्व, रस्ते वाहतूक मंदावली title=

Mumbai Rain : मुंबईत कालपासून मुसळधाक पाऊस पडतोय. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत. आज दुपारी 4 वाजून 10  मिनिटांनी समुद्रात  उंच लाटा समुद्रात उसळतील. 

मुंबईत भरतीवेळी 4 मीटरच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भरतीच्या काळात मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास, समुद्राचं पाणी ड्रेनेज लाइनमधून मुंबई शहर आणि उपनगरात पोहोचेल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सखल भागात पाणी साचलं

मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरुय. आणि त्याचे परिणाम मुंबईत पाहायला मिळतायत. सखल भागामध्ये पाणी साचलंय. वाहतूक पूर्णपणे मंदावलीय. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागतेय. हिंदमाता परिसर जलमय झाला असून मुंबई महानगरपालिकेने केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. 

मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका बसला आहे मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक उशीराने सुरु आहे. कुर्ला रेल्वे रुळ पाण्याखाली गेला आहे. 

मुंबई उपनगरातही संततधार
पूर्व मुंबई उपनगरातही पावसाची संततधार ही सुरू आहे. त्याचा फटका मुंबईच्या जनजीवनावर देखील पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. भांडुप एल बी एस मार्ग पन्हालाल कंपाऊंड जवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एल बी एस मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही प्रभावीत झाली आहे. या मार्गा शेजारून जाणाऱ्या न्यायालयाची साफसफाई नीट न झाल्यामुळे नाल्यातील पाणी हे थेट रस्त्यांवर येत आहे. 

त्यामुळे हा रस्ता जलमय झालेला आहे. तर भांडुप स्टेशन परिसरात देखील पाणी साचलंय.  घाटकोपर पंचशील नगर परिसरामध्ये संरक्षक भिंतीचा काही भाग हा घरांवर कोसळल्यामुळे एका घराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या घरांना देखील आता स्थलांतरित केलं जाणार आहे. 

मुलुंड ,विक्रोळी ,घाटकोपर, कांजुर परिसरातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर मात्र या पावसाचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे.