अरविंद सावंतांचं मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर भावना गवळी 'नॉट रिचेबल'

आपल्या पक्षातील एकमेव महिला खासदार असलेल्या भावना गवळी यांची नाराजी शिवसेना कशी दूर करणार?

Updated: May 30, 2019, 12:36 PM IST
अरविंद सावंतांचं मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर भावना गवळी 'नॉट रिचेबल' title=

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आलंय. आज अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना थेट कॅबिनेट पद मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, दुसरीकडे मात्र नाराज शिवसेना खासदार भावना गवळी यांचा फोन बंद येतोय. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी सध्या मुंबईतच आहेत. परंतु, त्या कुणाच्याही संपर्कात नाहीत. आज होणाऱ्या शपथविधीलाही भावना गवळी दांडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अरविंद सावंत यांना मंत्रिपद दिल्यानं गवळी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. आता आपल्या पक्षातील एकमेव महिला खासदार असलेल्या भावना गवळी यांची नाराजी शिवसेना कशी दूर करणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. 

माणिकराव ठाकरेंवर विजय

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांचा दणदणीत पराभव केला. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा ९३,८१६ मतांनी पराभव केला होता.

शिवसेनेत नाराजी'नाट्य'?

शिवसेनेचे मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याच्या बातम्या आल्यानंतर शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये मात्र नाराजी असल्याचं चित्र दिसून येतंय. दक्षिण मुंबईतले खासदार अरविंद सावंत यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. यामुळे शिवसेनेचे इतर ज्येष्ठ खासदार नाराज झाले आहेत. यातूनच मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदारानं लोकसभेतलं गटनेते पदही नाकारल्याच समजतंय.

संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

दुसरीकडे, या चर्चा चुकीच्या असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेनेत कोणतीही नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 'भाजपाकडे बहुमत असल्याने त्यांचे मंत्री जास्त हे निश्चित असून भावनिकतेवर राजकारण चालत नाही त्यामुळे शिवसेनेला एकच मंत्रिपद मिळणार आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांचं नावं सुचवलं आहे. अरविंद सावंत हे अनुभवी असल्याचंही' संजय राऊत यांनी म्हटलंय.