Hathras Case : 'उत्तर प्रदेश पोलीस, प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करतंय?'

राज ठाकरेंचा थेट सवाल   

Updated: Oct 1, 2020, 08:43 PM IST
Hathras Case : 'उत्तर प्रदेश पोलीस, प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करतंय?'  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : साऱ्या देशाचं मन सुन्न करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणी अनेक नेतेमंडळींनी संताप व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांसोबतच सर्व स्तरांतील मंडळींनी हाथरस घटनेचा निषेध केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडिचा आधार घेत उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. 

उत्तर प्रदेशातील हाथरस Hathras येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं, ही वस्तुस्थिती अधोरेखित करत उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी केला. 

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचाही समाचार घेतला
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणी भेटायला जात असल्याच त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जात आहे, असं विचारत स्थानिक सरकारला नेमकी कशाची भीती वाटते हा प्रश्न त्यांनी मांडला.
राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 

 

हाथरस मधली ही घटना पाशवी असल्याचं म्हणत, या घटनांनंतर लगेचच निषेधाचा सूर आळवल्यानंतर काही दिवसांनी मौन बाळगणं ही बाब चालणारच नाही हा मुद्दा त्यांनी प्रकर्षानं मांडला.  सोबतच अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणणं गरजेचं असल्याचं म्हणत राज ठाकरे याच मतावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं.