तयार अन्न तीन वर्ष टिकवता येईल, मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान

तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन झाले आहे.

अमित जोशी | Updated: Feb 8, 2019, 11:28 PM IST
तयार अन्न तीन वर्ष टिकवता येईल, मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान title=

मुंबई : तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन करुन एक इडली तयार करण्यात आली आहे. ही इडली चक्क तीन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. इडली आता चक्क तीन वर्षं टिकणार आहे, असे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. तयार अन्न हे जास्त काळ ते सुद्धा तब्बल तीन वर्ष टिकवता येईल, असे तंत्रज्ञान मुंबई विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातल्या संशोधकांनी विकसित केले आहे. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तयार अन्नाची चव ही तीन वर्षानंतरही अन्न पदार्थ अगदी ताजा वाटेल, अशी असल्याचा संशोधकांचा दावा आहे. इलेक्ट्रॉन बीम रेडिएशन  या तंत्रज्ञानाचा वापर करत हे संशोधन करण्यात आले आहे. याबाबत भौतिकशास्त्राच्या विभाग प्रमुख  डॉ. वैशाली बांबोले यांनी नेमकं तंत्रज्ञान काय आहे याची माहिती दिली. त्यासांगतात हे पदार्थ लष्करासाठी, अवकाशात अंतराळवीरांसाठी वापरता येऊ शकतात.

कमी प्रोटिन आणि कमी तेल असलेले तयार अन्न पदार्थ हे या संशोधनासाठी निवडण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे या संशोधनात preservative म्हणजेच परिरक्षक  वापरण्यात आलेले नाहीत हे विशेष. साध्या फ्रीजमध्येही हे अन्न पदार्थ साठवता येणार आहेत. या संशोधनाचं पेटंट मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे जर यशस्वी झाले तर असे अनेक पदार्थ वर्षानुवर्षं टिकवणं शक्य आहे.