ST Bus : नियमित कामांवर आलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कधी? एसटी महामंडळाने दिली माहिती

लातूर आणि धारूर इथं बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Updated: Dec 6, 2021, 08:29 PM IST
ST Bus : नियमित कामांवर आलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कधी? एसटी महामंडळाने दिली माहिती title=

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच कॉलेज आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागल्याचा दावा शासनाने केला आहे. 

आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19 हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी 734 बसेसद्वारे सुमारे 1703 फेऱ्यांच्या माध्यमातून 1 लाख 4 हजार 800 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत 76 लाख 30 हजार रूपयांची भर पडली आहे.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता एसटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिक, कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशी जनतेची एसटीअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे, असं आवाहन केलं होते. 

ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असा इशारा देत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देणार असल्याचं अनिल परब यांनी घोषित केलं होतं. अनिल परब यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जे कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, त्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे.

अनिल परब यांच्या आवाहनामुळे रविवारी अनेक कर्मचारी कामावर परतले. तर सोमवारी या संख्येत वाढ होऊन उपस्थितांची संख्या 19 हजारांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या आवाहनानंतर शनिवार 3 डिसेंबरला अवघी 49 आगारे सुरु होती. अवघ्या तीन दिवसानंतर 56 आगारांची भर पडून सोमवारी राज्यभरातील 105 आगारे सुरु झाली आहेत. 

राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमिवर आगारातून एसटी वाहतूक करताना आतापर्यंत 40 हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणे, गेट बंद करणे आदी घटनांवरून 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, लातूर आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटीला प्रतिबंध करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. वाहतूकीला विरोध करणाऱ्या 14 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर धारूर इथंही संपकरी कर्मचाऱ्यांनी आगारातून बाहेर पडणारी बस अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.