आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

कपिल राऊत | Updated: Sep 27, 2023, 06:20 PM IST
आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर title=

मुंबई  :  29 सप्टेंबरला ईदची (Eid) सुट्टी जाहीर करण्यात आलीय. सरकारनं ही सुट्टी जाहीर केलीय. गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला आहे. त्यामुळे ईदची सुट्टी परवा जाहीर करण्यात आलीय. 28 सप्टेंबरला म्हणजे गुरुवारी अनंत चतुर्दशीची (Anant Chaturdashi) सुट्टी आहे. त्यापाठोपाठ 29 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी तुम्हाला सुट्टी असेल तर शनिवार, रविवार सुट्टी (Holiday) आणि सोमवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी अशी सलग पाच दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळू शकणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलिसांना शक्य व्हावं, यासाठी शुक्रवारची सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सांगितलं.

ईदची सुट्टी शुक्रवारी
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावं आणि गर्दी तसंच मिरवणुकांचे नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून 29  तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.  अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन 29 सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि  शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील गणेशभक्तांना केले आहे. गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसंच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असं मुख्यमंत्री म्हटलंय.

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसंच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. 1 ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी  ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  'प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.