डबल व्होटींग... मतदानाचा `कानडा गेम`

पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 12:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.
कुलाब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील अनेक घरांना सध्या कुलूपं लागलेली दिसतायत. कारण इथले मतदार सहकुटुंब सहपरिवार सध्या कर्नाटकातील आपापल्या गावी मतदानासाठी गेलेत. काल कर्नाटकमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता गावी गेलेले हे मतदार पुन्हा मुंबईत येवून २४ एप्रिलला दुसऱ्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 
तुम्हालाही बसला ना आश्चर्याचा धक्का...? हे मतदार दोनवेळा मतदान कसं करू शकतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...? तर पण झी मीडियानं केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुलाबा आणि कर्नाटक अशा दोन्ही ठिकाणच्या मतदारयाद्यांमध्ये या मतदारांच्या नावांची नोंद आहे. त्याचे पुरावेच `झी २४ तास`कडे उपलब्ध आहेत.
 
रामू शंकर राठोड... तेच नाव, तोच फोटो, तीच व्यक्ती... फरक एवढाच की, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारयादीत मराठीत हे नाव लिहिलंय, तर कर्नाटकातील यादीत कन्नड भाषेत...
सोमनाथ पून्या राठोड.... थावरु सोमा राठोड... शिवाजी नामदेव चव्हाण... ही नावं फक्त वानगीदाखल. असे हजारो मतदार आहेत, ज्यांची नावे दोन्ही राज्यांच्या मतदारयाद्यांमध्ये आहेत. मुंबईतल्या २२६ नंबरच्या वॉर्डमध्ये हे मतदार राहतात, याबद्दल तक्रारदेखील दाखल करण्यात आलीय. प्रशांत घाडगे यांनी ही तक्रार दाखल केलीय.  
कर्नाटकात काल मतदान केल्यानंतर आता हेच लोक पुन्हा मुंबईत मतदानासाठी परतणार आहेत. २४ एप्रिलला ते पुन्हा मतदान करणार आहेत. आणि हा प्रकार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये राजरोसपणे सुरू आहे. `मतदारांचा हा कानडा गेम` दहा-बारा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणण्यात आला. मात्र, दुर्दैवानं निवडणूक आयोगानं त्याची कुठलीही दखल घेतली नाही.
निवडणूक आयोगाच्या सुस्त कारभाराची लक्तरेच यामुळं वेशीवर टांगली गेलीत. शाई पुसून दोनदा मतदान करण्याचं गंमतीदार विधान शरद पवारांनी मध्यंतरी केलं होतं. या मतदारांनी ते सिरीयसली तर घेतलं नाही ना...? राजकीय पक्षांकडून व्होटबँक सांभाळण्यासाठी हे प्रकार सुरू नाहीत ना..? आणि लाखो लोकांना मतदानापासून वंचित ठेवणारा निवडणूक आयोग दोनदा मतदान करणाऱ्यांवर ही मेहेरनजर का दाखवतोय...? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उभे राहिलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.