एकनाथ खडसेंचं काय चुकतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षासाठी छातीचा कोट करणारा नेता, अशी ओळख एकनाथ खडसेंची विरोधी पक्षनेतेपदी असताना होती. मात्र सत्तेत येऊन दोनवर्ष पूर्ण होण्याआधी खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलं आणि त्यांना पक्षांतर्गत आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. असं का झालं? खडसेंचं नेमकं कुठे चुकलं? राजकीय वर्तुळात खडसेंविषयी नेमकी काय चर्चा आहे, हे समजून घेणे आता महत्वाचे आहे. 

Updated: Jun 1, 2016, 07:25 PM IST
एकनाथ खडसेंचं काय चुकतंय? title=

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षासाठी छातीचा कोट करणारा नेता, अशी ओळख एकनाथ खडसेंची विरोधी पक्षनेतेपदी असताना होती. मात्र सत्तेत येऊन दोनवर्ष पूर्ण होण्याआधी खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलं आणि त्यांना पक्षांतर्गत आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. असं का झालं? खडसेंचं नेमकं कुठे चुकलं? राजकीय वर्तुळात खडसेंविषयी नेमकी काय चर्चा आहे, हे समजून घेणे आता महत्वाचे आहे. 

१) खडसेंनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर आपल्या खात्याशी संबंधित अनेक महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले, पण ते विरोधकांसह मित्रांच्याही डोळ्यात खुपले, खडसेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याने ते असं करतायंत का, असा गैरसमज पक्षांतर्गत काही लोकांचा झाला असावा, आपण अनुभवाच्या जोरावर आणि पक्ष तसेच राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहोत असं वरिष्ठांना समजवून देण्याची गरज होती.

२) तरूण मुलगा गेल्याने भावनिक होऊन सुनेला खासदारकीचं तिकिट दिलं, तेव्हा त्या आधीचे खासदार हरिभाऊ जावळे सारखे त्यांचे विश्वासू नेते मनातल्या मनात का असेना नाराज झाले. हरिभाऊ आता खडसेंच्या पाठिशी उभे राहिले असते, पण आता खासदार सून रक्षा खडसे, या खडसेंच्या पाठिशी उभ्या राहिल्या तरी तो घरातलाच पाठिंबा समजला जाईल.

२) मुलगी रोहिणी खडसे यांना जिल्हा बँक अध्यक्षपदी निवडून आणले, यात अनेक विश्वासू आणि सत्तेत पदं मिळतील अशी अपेक्षा असलेल्या लोकांची नाराजी ओढवून घेतली. आताही रोहिणी समर्थनासाठी पुढे आल्या, तर त्याही खडसेंच्या कुटुंबातीलच समजल्या जातील.

३) 'महानंद'च्या चेअरमनपदी, खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे बिनविरोध निवडून आल्या, ते पद देखील खडसेंनी पक्षातील बड्या नेत्याला दिलं असतं, तर ते देखील त्यांच्यासाठी धावून आले असते.

४) जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आणि खडसे यांच्यात सतत आरोपांच्या चकमकी होत असतात, गुलाबरावांना विश्वासात घेऊन, त्यांना मंत्रिपद मिळवून दिलं असतं, तरी गुलाबराव हे कदाचित खडसेंचे कायमचे समर्थक झाले असते.

५) खडसे मंत्रिपदी आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी जेवढा संपर्क ठेवायला पाहिजे होता, तेवढा न ठेवल्याने इतर पक्षांतर्गत लोक त्याचा फायदा घेत आहेत का याची सतत चाचपणी सुरू ठेवणे गरजेचे होते. नागपुरातील ज्येष्ठ नेत्यांच्या तसेच संघातील नेत्यांच्या जास्तच जास्त संपर्कात असणे गरजेचे होते, यावरून त्यांना काय चुका होत आहेत किंवा गैरसमज होत आहेत, याची कल्पना आली असती, आणि त्यात सुधारणा करता आली असती.