कपल्समध्ये का वाढतायत भांडणं? तुम्हीही करत नाही ना या चुका?

तुमचाही होतोय का पार्टनरशी सारखा वाद, मग ही कारणं असू शकतात  

Updated: Jun 24, 2022, 06:13 PM IST
कपल्समध्ये का वाढतायत भांडणं? तुम्हीही करत नाही ना या चुका? title=

मुंबई : रुसवे फुगवे तर प्रेमात असतात. पण जेव्हा त्या नात्यात वाद वाढतात तेव्हा ते नातं अधिक गुंतागुंतीचं व्हायला लागतं. गैरसमज आणि वाढणारे वाद यामुळे नातं टिकवणं कठीण होतं. ती तारेवरची कसरत वाटू लागते. वाद होण्यामागे दोन भिन्न विचार हे कारण असतं. मात्र काही नात्यांमध्ये छोट्या चुकांमुळे हे वाद विकोपाला पोहोचतात. 

पार्टनरसोबत राहताना छोटी छोटी भांडणं होणं साहजिकच असतं. पार्टनरची समजूत घातल्यावर पुन्हा सगळं सुरळीत होतं. पण पुन्हा पुन्हा भांडण होत असेल तर समजूतदारपणा दाखवायची वेळ आली आहे असं समजून घ्या. 

सततच्या भांडणांमुळे पार्टनरही कंटाळतो, अस्वस्थ होतो. एका चांगल्या नात्यासाठी काही चुका किंवा गोष्टी टाळणं फार महत्त्वाचं आहे. या चुका होऊ दिल्या नाहीत तर नातं उत्तम टिकून राहू शकतं.

1. समजूतदारपणा- नात्यात समजूदारपणा खूप गरजेचा आहे. त्यामुळे वाद विकोपाला पोहोचणार नाहीत. कुठे थांबायचं हे कळायला हवं. शब्दाला शब्द वाढला तर नातं तुटतं. तुम्ही प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत. जेव्हा एकाचा आवज चढतो तेव्हा दुसऱ्याने शक्यतो वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शांतपणे बोलून विषय सोडवायला हवा. 

2. जुन्या गोष्टी उकरून काढणं- बऱ्याचदा जुन्या गोष्टी सतत बोलल्यानेही वाद होऊ शकतो. मग त्या पार्टनरच्या पास्टबद्दल असूदे किंवा एखाद्या घटनेविषयी असूदे. गोष्टी जेव्हाच्या तेव्हा क्लिअर करायला हव्यात. कधीकधी मजामस्करीतही हर्ट होईल असं बोललं जातं. टोमणे मारले जातात. या सवयी पार्टनरच्या बाबतीत टाळा.

3. वेळ न देणे- अनेकवेळा आपण ऑफिसच्या कामात अडकतो, ज्यामुळे आपण आपल्या पार्टनरला वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडण होतं. काहीवेळा रोजच्या भांडणाला कंटाळून बाहेर प्रेम शोधू लागतो. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा. पार्टनरशी बोला, त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. वेळ मिळेल तेव्हा कुठेतरी फिरायला जा त्यामुळे मन प्रसन्न राहील.