अनुच्छेद ३७० हटवल्याने विरोध करणाऱ्या मलेशिया, तुर्कस्तानला भारत जोरदार झटका देणार

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर तुर्कस्तान आणि मलेशियाने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता.

Updated: Oct 12, 2019, 09:29 AM IST
अनुच्छेद ३७० हटवल्याने विरोध करणाऱ्या मलेशिया, तुर्कस्तानला भारत जोरदार झटका देणार title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर तुर्कस्तान आणि मलेशियाने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता. त्यानंतर आता या दोन्ही देशांना भारत लवकरच झटका देण्याची शक्यता आहे. या दोन्ही मुस्लीम देशांसोबत भारत व्यापार कमी करण्याचा विचार करत आहे. मलेशियाकडून भारत पामतेल आयात करायचा. पण लवकरच ही आयात कमी किंवा बंद केली जावू शकते. 

भारत सरकार मलेशियाकडून पामतेल आयात करणं बंद करु शकतो. तसेच इतर वस्तूंची आयात देखील कमी केली जावू शकते. मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारताच्या अनुच्छेद ३७० हटवण्याच्या निर्णयाचं मागील महिन्यात संयुक्त राष्ट्रात विरोध केला होता.

भारताच्या या निर्णयाचा विरोध करणाऱ्या तुर्कस्तान आणि मलेशियाने स्वत:च्या पायावरच कुऱ्हाड मारुन घेतली आहे. मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद यांनी म्हटलं होतं की, भारताने काश्मीरवर ताबा मिळवला. याशिवाय भारताने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान सोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. भारताने यावर टीका करत नकार दिला होता. जगात एडिबल ऑइल आयात करणारा भारत सर्वात मोठा देश आहे. जर भारताने मलेशियाकडून पामतेल घेणं बंद केलं तर याचा मोठा फटका मलेशियाला बसू शकतो.

प्रत्येक वर्षी भारत जवळपासृ ९० लाख टन पाम तेल खरेदी करतो. ही आयात इंडोनेशिया आणि मलेशियाकडून केली जाते. या वर्षी सुरुवातीच्या ९ महिन्यात मलेशियाकडून सर्वाधिक पामतेल आयात करणारा भारत हा एकमेव देश आहे. मलेशियाकडून पामतेल आयात बंद करुन इंडोनेशिया, यूक्रेन आणि अर्जेंटीनाकडून भारत पामतेल आयात करु शकतो.