मुंबई : रणबीर कपूर, रणवीर सिंग या कलाकारांच्या यादीत आता अभिनेता विकी कौशलच्याही नावाचा समावेश झाला आहे. 'चॉकलेट बॉय' आणि अशा अनेक साचेबद्ध संज्ञा, परिभाषा मोडित काढत विकीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'संजू', 'राझी' या चित्रपटांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. पण, खऱ्या अर्थान त्याच्या चेहऱ्याने घराघरात स्थान मिळवलं ते म्हणजे 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटामुळे.  एक अभिनेता म्हणून 'उरी'मुळे विकी नावारुपास आलाच. पण, त्यासोबतच कलाविश्वातील अग्रगणी कलाकारांच्या यादीतही त्याचं नाव गणलं जाऊ लागलं. थोडक्यात विकीचा भाव वधारला. हे त्याने गतकाळात काम केलेल्या एका चित्रपट दिग्दर्शकाचं मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही काळापूर्वी 'डेक्कन क्रोनिकल'ला देण्यात आलेल्या मुलाखतीत या दिग्दर्शकाने यशाच्या वाटेवर अतिशय वेगाने निघालेल्या विकीविषयी हे वक्तव्य केलं. येत्या काळात एका चित्रपटासाठी आपण विकीची निवड करु इच्छितो. पण, त्याची निवड करण्याइतकं मानधन मात्र आपल्या आवाक्याबाहेरचं असल्याचंही त्या दिग्दर्शकाने स्पष्ट केलं. ओळख सांगण्याच्या अटीवर या दिग्दर्शकाने आपले विचार मांडले. 'मला वाटत नाही मी पुन्हा त्याला माझ्या चित्रपटासाठी निवडू शकेन. चित्रपटविश्वात त्याचं स्थान बदललं आहे. आता तो बदलला आहे की नाही हे ठाऊक नाही. पण, आता मात्र तो करण जोहर आणि त्याच्या मित्रमंडळींच्या वर्तुळात दिसतो', असं ते म्हणाले. या कला जगतात पुढे कसं जायचं याचीच सिकवण ते त्याला देत असतावेत. मुळात ही बाब चांगलीही असल्याचं दिग्दर्शकाने स्पष्ट केलं. 


विकीच्या या अशा वागण्याचा त्याच्या खासगी आयुष्यावरी परिणाम झाला असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरप्रती त्याला वाटणारी आपुलकी आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याशी वाढती जवळीक, या कारणांमुळेच विकी आणि त्याची तथाकथित प्रेयसी हरलीन सेठी यांच्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. 'आलिया किंवा कतरिनाला डेट करावं, असं त्याला आता वाटत आहे. कारण, विकी यशाच्या पायऱ्या इतक्या वेगाने चढत आहे की, त्याला आपल्या पायाखाली असणारं विश्वही दिसत नाही आहे', असं त्या दिग्दर्शकाने सांगितलं. मुळात ही बाब अत्यंत गंभीर असून, खुद्द विकीने त्याकडे लक्ष देण्याचीच जास्त गरज असल्याचं म्हटलं जात आहे.