बिहारच्या (Bihar) अरवल जिल्ह्यातील (Arval District) एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील 40 महिलांची पती एकच आहे, ज्याचं नाव रुपचंद आहे. जातीय जनगणना केली जात असताना हा खुलासा झाला असून अधिकारीही चक्रावले आहेत. अरवल जिल्ह्यामधील कुंटणखाण्यातील 40 महिलांनी रुपचंद नावाची व्यक्ती आपला पती असल्याचं सांगितलं आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी मुलांना विचारलं तेव्हा त्यांनीही वडिलांचं नाव रुपचंद असं लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्ड नंबर 7 कुंटणखाण्यात राहणारे लोक नाचगाणं करत आपलं पोट भरतात. त्यांच्या राहण्याचं कोणतंही ठिकाण नाही. अशा स्थितीत या महिलांनी पतीचं नाव रुपचंद सांगितलं असल्याने सगळीकडे चर्चा रंगली आहे. 


बिहारमध्ये सध्या जातीय जनगणना केली जात आहे. यावेळी अधिकारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. अधिकारी जेव्हा पालिका क्षेत्र वॉर्ड क्रमांक 7 येथे पोहोचले तेव्हा 40 महिलांनी रुपचंद नावाची व्यक्ती आपला पती असल्याचं सांगितलं. तसंच डझनहून जास्त मुलांनी वडिलांचं नाव रुपचंद सांगितलं. 


नितीश कुमार सरकारने 7 जानेवारीपासून बिहारमध्ये बहुचर्चित जातीवर आधारित जनगणना सुरू केली. यासाठी 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बिहार सरकार ही जनगणना दोन टप्प्यात करत आहे. पहिल्या टप्प्यात सर्व घरांची मोजणी करायची होती. तर दुसऱ्या टप्प्यात सर्व जाती, पोटजाती आणि धर्मातील लोकांशी संबंधित डेटा गोळा केला जाणार होता. सर्व लोकांच्या आर्थिक स्थितीची माहिती देखील नोंदवली जाणार आहे. 


कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डमध्ये महिलांनी पती म्हणून एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद केली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात जातीवर आधारित जनगणना केली नाही पाहिजे यासाठी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. जातीवर आधारित जनगणना करणं मोठं आणि कठीण काम असल्याचं केंद्राचं म्हणणं होतं.  


पण यानंतरही बिहार सरकार जनगणना करत आहे. हीच जनगणना सुरु असताना हे प्रकरण समोर आलं आहे. पण यानिमित्ताने हा रुपचंद नेमका कोण आहे, ज्याच्या इतक्या बायका आणि मुलं आहेत अशी चर्चा रंगली आहे.