नवी दिल्ली: कोरोना (Coronavirus) हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. यावेळी गडकरी यांनी म्हटले की, आपल्याला कोरोनासोबत जगण्याची कला आत्मसात करावी लागेल. कारण कोरोना हा नैसर्गिक विषाणू नाही. हा प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला कृत्रिम विषाणू आहे. सध्या जगातील अनेक देश या विषाणूवर मात करणारी लस शोधत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला होता. यानंतर हा व्हायरस जगभरात पसरला असून आतापर्यंत कोरोनामुळे अडीच लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यापूर्वी अमेरिकेने कोरोना हा चीननिर्मित व्हायरस असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धही रंगले होते.

मात्र, नितीन गडकरी यांच्या रुपाने भारताने प्रथमच कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भात थेटपणे भाष्य केले आहे. कोरोना सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला होता. परिणामी गडकरी यांच्या विधानचा रोख अप्रत्यक्षपणे चीनकडेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गडकरी यांचे हे वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे. 

यावेळी गडकरी यांनी कोरोनाच्या निदानासाठी प्रभावी चाचणी (टेस्टिंग) पद्धतीची गरज असल्याचेही सांगितले. जेणेकरून कोरोनाबाधित व्यक्तींना तातडीने ओळखता येईल, असे गडकरी यांनी म्हटले. मात्र, आता भारताने आणि एकूणच जगाने कोरोनाशी लढण्याची तयारी केली आहे. अनेक देशांतील शास्त्रज्ञ कोरोनावरील लसीसाठी संशोधन करत आहेत. त्यामुळे एकदा का लस मिळाली की पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होईल. यानंतर सगळ्या समस्या संपुष्टात येतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

सध्याच्या घडीला जगातील अनेक देश कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चीनविरोधात कडक पावले उचलण्याचा विचार करत आहेत. आतापर्यंत जगातील जवळपास ४३ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून २.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.