मुंबई : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू आणि काश्मीर परिसर आणि इतर भागामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून साऱ्या देशात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांपासून या भागात बर्फवृष्टची होत असल्यामुळे त्याचा स्थानिक वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगर- लेह राजमार्ग सलग आठव्या दिवशीही बंद ठेवण्यात आला असून, जम्मू- काश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या रस्त्यावरील सर्व वाहतूक श्रीनगर-जम्मू राजमार्गावर एका दिशेने सुरु करण्यात आली आहे. 


मोठ्या प्रमाणावर होणारी बर्फवृष्टी आणि त्याने दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम पाहता प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याविषयीचाच एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रजौरी येथील मुघल रस्स्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरु असल्याचं पाहयला मिळत आहे. 



मुख्य म्हणजे निसर्गाचं हे रुप या परिसरात राहणाऱ्यांसाठी नवं नसलं तरीही गेल्या काही दिवसांपासून होणारी बर्फवृष्टी ही काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम करत आहे हे नाकारता येणार नाही. 


दरम्यान, बर्फाची सफेद चादर आणि रस्त्यावर गुडघ्यापर्यंत साठलेला बरप्फ काढण्याचं काम रजौरी भागात सुरु असून, रस्त्यांवरील वाहतून काही प्रमाणात पूर्वपदावर आणण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला असून संपूर्ण देशातही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. थंडीची लाट महाराष्ट्रापर्यंतही पोहोचली असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी तापमानात घट झाल्याचं लक्षात येत आहे.