नवी दिल्ली: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस एन्काउंटरनंतर राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मानवधिकार आयोगाकडून लवकरच घटनास्थळी एक पथक पाठवण्यात येईल. आज पहाटे हैदराबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी नेले होते. याचठिकाणी आरोपींनी पीडितेला जाळले होते. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी आणले होते. त्यावेळी या आरोपींना पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आरोपींनी पीडितेवर अमानुषपणे अत्याचार केल्यामुळे देशभरात त्यांच्याविषयी संतापाची भावना होती. त्यामुळे अनेकांनी सायबराबाद पोलिसांच्या या कृतीचे स्वागत आहे. तर अनेकांनी हा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याचे सांगत पोलीस एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 



या घटनेनंतर सायबराबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आमच्यावर गोळी झाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन पोलिसांनाही दुखापत झाल्याचे व्ही.सी. सज्जनार यांनी सांगितले.