नवी दिल्ली : जगभरात कोरोना वायरसच्या संकटावर चर्चा सुरु असताना पाकिस्तानच्या कुरापत्या सुरुच आहेत. केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमारेषेचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्याने याला जशास तसे उत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे तोफखाने, दहशतवाद्यांचे लॉंच पॅड सहित अन्य ठिकाणांना लक्ष्य केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमारेषेजवळ असलेले दहशतवाद्यांचे लॉंचपॅड भारतीय तोफांनी उद्धस्त केले आहेत. या विभागात मागच्या रविवारी पाकिस्तानी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात मोठी चकमक झाली. भारतीय सैन्यातील पॅरा स्पेशल फोर्सेसचे पाच जवान यामध्ये शहीद झाले. 


भारतीय सैन्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सकाळी सहा वाजता सीमा रेषेचे उल्लंघन केले. याला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिले. 



भारतीय सैन्याकडे असलेल्या १०५ मिमी फिल्ड गन व्यतिरिक्त १५५ मिमिच्या बोफोर्स तोफांनी एलओसी जवळ असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या तोफा आणि दहशतवाद्यांच्या लॉंचिंग पॅडवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. हा गोळीबार दिवसभर सुरु होता.