नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार बनणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. हिमाचलमध्ये भाजपचा सहज विजय झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्ये मात्र काँग्रेसनं कडवी झुंज दिली. यामुळे भाजपच्या गुजरातच्या मिशन १५० च्या स्वप्नांना सुरुंग लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं १५० जागा जिंकण्याचं स्वप्न ठेवलं होतं. पण १५० जागा का जिंकता आल्या नाहीत यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं उमेदवार आयात केले आणि जातीचं राजकारण केलं, यामुळे आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, असं अमित शहा म्हणाले.


जातीवाद - वंशवादाचा पराभव


ते पुढे म्हणाली की, ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आपली लोकशाही बदलत आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये वंशवाद आणि जातिवादाचा पराभव झाला. गुजरातमध्ये भाजपचं जनसमर्थन १.२५ टक्के वाढलं आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली आहे’. हिमाचल प्रदेशबाबत ते म्हणाले की, भाजपला मिळालेलं बहुमत हे दर्शवतं की, लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास यात्रेसोबत चालायचं आहे.


२०१९ मध्ये आम्हीच सत्तेवर येऊ


आम्हाला विश्वास आहे की, २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवू तेव्हा आमचाच विजय होईल. तसेच देशातील तरूणांचा आणि लोकांचं त्यांना समर्थन मिळेल.


गुजरातमध्ये भाजपला सत्ता टिकवणे फारच कठिण झाले होते. मात्र तरीही त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. पण सत्ता स्थापन करताना २२ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता असलेल्या भाजपची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.


पंतप्रधानांचं ट्विट


गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जीता विकास, जीता गुजरात। जय जय गरवी गुजरात! आणि हिमाचल प्रदेश में लहराया कमल, विकास की हुई भव्य जीत। असं ट्विट मोदींनी केलं आहे.


गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे निकाल म्हणजे सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा आहे. अथक परिश्रम करून या राज्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना माझा सलाम. गुजरात आणि हिमाचलच्या जनेतला मी वंदन करतो. भविष्यात दोन्ही राज्यांचा विकास करण्यासाठी अथकपणे प्रयत्न करू, असं मोदी म्हणालेत.