Ajit Pawar Responds To Sanjay Raut: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होतेय की काय अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा दबक्या आवाजात होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात आहे. रविवारी अजित पवार यांनी आपल्या विधानामधून राऊतांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.


राऊतांचा टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रविवारी मुंबईत आयोजित केलेल्या राज्यव्यापी मेळाव्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच आमचे नेते असून अनेक भावी मुख्यमंत्र्यांची सध्या चर्चा आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. मागील काही काळापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या फोटोंसहीत बॅनरबाजी करण्यात आल्याचा मुद्द्यावरुन हा निशाणा साधण्यात आला. मात्र आता याच मुद्द्यावरुन अजित पवारांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांना वाटत होतं की महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष चालेल. मात्र आता त्यांना स्वत:चं सरकार स्थापन करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.


...म्हणून आम्ही एकत्र


संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानामध्ये आमच्या मनात असेल तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू नाहीतर स्वत: भगवा फडकवू असंही म्हटलं होतं. याच विधानावर अजित पवारांनी राऊतांना टोला लगावला आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र यासाठी आहो कारण आज आम्ही एकत्र आलो नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाविरुद्ध लढू शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले.


आमच्या शुभेच्छा


जोपर्यंत उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तोपर्यंत संजय राऊतांना हे सरकार 25 वर्ष चालेल असं वाटत होतं. आता त्यांना त्यांच्या पक्षाचं स्वत:चं सरकार असावं असं वाटत असेल तर त्याच चुकीचं काय आहे? पक्ष एक ध्येय समोर ठेऊन पुढे वाटचाल करत आहे. आमचं यावर काहीही म्हणणं नाही. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहे, अशी खोचक प्रतिक्रीया अजित पवारांनी नोंदवली आहे.


भाजपावर निशाणा


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंना बसवण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवण्याचा पवारांचा मानस असल्यानेच शिवसेनेचे 40 आमदार वेगळे झाल्याचंही बावनकुळे म्हणाले होते. यासंदर्भात अजित पवारांना विचारलं असता त्यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला. "बावनकुळेंना दुसऱ्यांच्या डोक्यात काय विचार सुरु आहेत हे समजत असेल तर त्यांनी ते उघडपणे सांगायला नको. प्रसारमाध्यमे बातम्या दाखवतात आणि त्यावर विरोधकांची प्रतिक्रिया विचारली जाते. मात्र आम्हाला याबद्दल काहीही बोलायचं नाही. सध्या महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासंदर्भातील अपेक्षा आहेत," असं अजित पवार म्हणाले.