Badlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या जलदगती न्यायालयाने असे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.


कोर्टात आज आरोपीला हजर केले होते. यावेळी कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलं आहे. मागील सुनावणीत कलम 6 अॅड करण्यात आले नव्हते. मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहे. कलम 6 अंतर्गंत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी 20 वर्षे किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वकिल प्रियेश जाधव यांनी दिली आहे. तसंच, या प्रकरणात शाळेची मुख्यध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलं आहे. मात्र, ते सध्या ते फरार आहेत. 


बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता. बदलापूरमध्ये पालकांचा आक्रोशही उसळला होता. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय आरोपी अक्षय शिंदे यालाही मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातच, कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. 


शाळेत पॅनिक बटन बसवणारः दीपक केसरकर


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. बदलापूरची घटना झाली होती. या संदर्भात एक अहवाल आता प्राप्त झाला आहे. आता डिपार्टमेंटची याबाबत बैठक होइल आणि या अहवालावर आम्ही काय निर्णय घेऊ ते तुम्हांला सांगू. जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करु तसंच, पोलिसांना सर्व अहवाल सादर करू, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 


तसंच, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली होती. आदिवासी शाळांवर नियंत्रण नसत ते शिक्षण विभागाकडे देण्यात यावे अस सांगितले आहे. तसंच, महिलांना शाळा व इतर ठिकाणी पॅनिक बटण द्यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यामुळं ताबडतोब पोलिसांना माहिती जाते व त्याची ट्रॅकिंग सिस्टम आहे. हे डिवाईस नेटवर्क नसलं तरी चालते. हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्वितणे नियंत्रण येईल. हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवणार आहोत, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.