Nashik Sinnar Shirdi Highway Accident : नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. साईभक्तांवर काळाचा घाला घालण्यात आला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खासगी आराम बस आणि ट्रकची (Private Bus - Truck Accident News) समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईच्या दर्शनासाठी ठाणे, अंबरनाथ परिसरातील भाविक खासगी बसने जात होते. बसमध्ये 50 लोक होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसमधील 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


 या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयी अधिक माहिती घेतली.  तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.



अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे. भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्यापैकी सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 



हा अपघात इतका भीषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आरडाओरडा ऐकू आल्याचे येथे उपस्थित असल्याने सांगितले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस मुंबईहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 जणांना मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.