नवी दिल्ली: देशभरात कोरोना व्हायरसचा Coronavirus प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात येणार आहे. आजपासून केंद्रीय पथकाच्या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. हे पथक आज गुजरातमध्ये दाखल होईल. तर उद्या हे पथके महाराष्ट्रात येणार आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार मुंबईसह राज्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचे सांगत आहे. मात्र, महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४.७ इतका आहे.  राष्ट्रीय पातळीवरील सरासरी मृत्यूदर ३.२ टक्के आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे ६,७३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे. 


मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येत गाठला उच्चांक


याशिवाय, महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यवस्थापनही केंद्रीय पथकांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे, पुणे, पालघर आणि सोलापूरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये तर मृत्यूदर सहा टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तिन्ही राज्यांमधील मृत्यूदर राष्ट्रीय पातळीवरील सरासरीपेक्षाही जास्त आहे. 


अरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ


त्यामुळे केंद्रीय पथकाकडून पाहणीनंतर या राज्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल या पथकाचे नेतृत्त्व करतील. या पथकात तज्ज्ञ डॉक्टर आणि साथरोगतज्ज्ञ असतील. तेलंगणातील परिस्थिती भयावह असल्याने हे पथक त्याठिकाणी दोन दिवस थांबेल. तर महाराष्ट्र आणि गुजरातमधील दौरा एक-एक दिवसांत आटोपला जाईल.