रत्नागिरी :  चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धरण फुटल्याने पुराच्या लोंढ्यात गुरे-ढोरेही पाण्यात वाहून गेलीत.  धरण फुटल्यानं नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेला असून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्हा प्रशासन टीम तिवरे गावात दाखल झाली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यानी या धरणाची पाहणी केली तसेच इथल्या गावकऱ्यांशी चर्चा देखील केली.


या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांची नावे


अनंत हरिभाऊ चव्हाण (६३)
अनिता अनंत चव्हाण (५८)
रणजित अनंत चव्हाण (१५)
ऋतुजा अनंत चव्हाण (२५)
दूर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष)
आत्माराम धोंडू चव्हाण (७५)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२)
नंदाराम महादेव चव्हाण (६५)
पांडुरंग धोंडू चव्हाण (५०)
रवींद्र तुकाराम चव्हाण (५०)
रेश्मा रवींद्र चव्हाण (४५)
दशरथ रवींद्र चव्हाण (२०)
वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८)
अनुसिया सीताराम चव्हाण (७०)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५)
बळीराम कृष्णा चव्हाण (५५)
शारदा बळीराम चव्हाण (४८)
संदेश विश्वास धाडवे (१८)
सुशील विश्वास धाडवे (४८)
रणजित काजवे (३०)
राकेश घाणेकर(३०)