योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकच्या इगतपुरीमध्ये (Nashik Igatpuri) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेचा (superstition) डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार समोर आलाय. भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना गाव सोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इगतपुरीच्या धारगावमधल्या भोरवाडी आदिवासी पाड्यावर एका लहान बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या बालकाचा मृत्यू भूतबाधा केल्यानं झाल्याचा आरोप करत एका कुटुंबाने इतर आठ कुटुंबांची झोप उडवली. हे कुटुंब नेहमी शिवीगाळ करुन भांडण उकरून काढत होतं. अखेर या आठ कुटुंबांना राहतं घर सोडण्यास सांगण्यात आले आहे.  परिस्थितीसमोर हतबल या आठ कुटुंबांनी घराची मोडतोड करत पाठीवर संसार घेत स्थलांतराला सुरुवात केली. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. 


मुलाच्या मृत्यूनंतर भुताटकी केली जात असल्याचे कारण देत सातत्याने होणाऱ्या छळास वैतागून इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी येथील आठ कुटुंबांनी आपल्या घरांची मोडतोड करीत स्थलांतर केले आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील आदिवासींच्या मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूतअजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


नेमका काय आहे प्रकार


भोरवाडी येथील एका कुटुंबातील आजारी असणाऱ्या बालकाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. भुताटकी केल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिवाराने गावात आठ कुटुंबांचा छळ सुरू केला. सातत्याने होणाऱ्या वादास वैतागलेल्या या आठ कुटुंबांनी अखेर वाद वाढल्याने याबाबत घोटी पोलिसांत धाव घेतली आणि आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


या गावातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगूबाई खडके, शांताराम खडके यांच्यासह अन्य दोन कुटंबांनी आपल्या राहत्या घरांची मोडतोड करीत पाठीवर संसार साहित्य घेत स्थलांतर केले. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यातील अंधश्रद्धेच्या प्रकाराची नव्याने चर्चा सरु झाली आहे.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली कठोर कारवाईची मागणी


इगतपुरी तालुक्यातील भूतकाळ भूताटकीच्या प्रकाराने छळ झाल्याने ग्रामस्थांनी घर सोडून पलायन केले. या घटने विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून आरोप करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर, स्थानिक महिलांनीही याबाबत न्याय देण्याची मागणी केली आहे.