Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाच उकाडा दिवसागणिक वाढू लागला आहे. सध्या देशातील राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानानं पन्नाशी ओलांडली असून, या उच्चांकामुळं इतर राज्यांवरही या परिस्थितीचे परिणाम होताना दिसत आहेत. राज्यातही उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सध्याचं हवामान पाहता वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तापमान कमी असेल. मात्र, सूर्याचा दाह कायम राहील. तिथं हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाचा आकडा 50 अंशांच्या घरात पोहोचला असून, इथं उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. 


हेसुद्धा वाचा : महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?


 



कुठवर पोहोचला मान्सून? 


मान्सून सध्या प्रगतीशील वाटचाल करत असून, दरवर्षी ठरल्या काळात येणारा हा पाहुणा अर्थात हे मोसमी वारे पुढील 72 तासांमध्ये केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकला असून, मादिवच्याही भागातही त्यानं प्रगती केली आहे. आयएमडीनं यंदाच्या मान्सूनचा प्राथमिक अंदाज वर्तवत असतानाच तो 31 मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचं सांगितलं होतं. ज्या धर्तीवर मान्सूनचा प्रवासही याच कलानं होताना दिसला ज्यामुळं आता पुढील तीन ते चार दिवसात मान्सून केरळात, दाखल होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पुढे हे वारे लक्षद्वीप आणि त्यानंतर हळुवार गतीनं देशाचा आणखी भाग व्यापणार असून, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.