Maharashtra Weather News : राज्यात आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या पावसानं अद्याप उसंत दिलेली नसतानाच आता पावसाचा जोर आठवड्याच्या शेवटी चांगलाच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागर क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं येत्या काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. परिणामी कोकणासह मुंबईचं किनारा क्षेत्र, उपनगरीय भाग आणि कोकणातील संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
फक्त कोकणच नव्हे, तर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रही पावसानं ओलचिंब होणार असून, यादरम्यान या सर्व क्षेत्रांमध्ये असणारे जलप्रवाह दुपटीनं वाहणार असल्याचं सांगत पावसाळी सहलींच्या अनुषंगानं बेत आखणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
 
सध्या कमी दाबाचा एक तीव्र पट्टा दक्षिणेकडे सक्रिय असून, राजस्थनातील जैसलमेरकडेही पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर, गुजरातपासून केरळपर्यंत पावसाचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.


हेसुद्धा वाचा :  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या बंगालच्या उपसागरात असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढल्यामुळं ओडिशापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाब क्षेत्र अधिक प्रभावीपणे तयार होताना दिसत आहे. परिणामी राज्यातील कोकण आणि विदर्भ पट्टा यामुळं प्रभावित होताना दिसणार आहे.


 


कोणकोणत्या भागात अलर्ट जारी?


यलो अलर्ट- मुंबई, पालघर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर
 
ऑरेंज अलर्ट – रायगड, ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, अमरावती
 
रेड अलर्ट – रत्नागिरी, चंद्रपूर