Pune Water Shutdown: पुणेकरांवर एखादा निर्णय लादणे हे खूपच कठीण मानले जाते. एखादा निर्णय डोइजड होतोय असे वाटले तर पुणेकर तात्काळ त्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडतात. आणि त्या निर्णयापासून त्यांची सुटका होते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिकेने 10 ऑगस्ट रोजी पुण्यात पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पर्वती MLR टँक परिसर, पर्वती LLR टँक परिसर, SNDT MLR टँक परिसर, चतुर्शृंगी टँक परिसर, लष्कर जल केंद्र परिसर आणि वडगाव जल केंद्र क्षेत्र येथे पाणी कपात होणार होती. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. 


पुण्यातील पाणी कपात निर्णयानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पालिकेने हा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त आहे.


महावितरण पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात तर 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते.  आदल्या दिवशीच गरजेचा पाणीसाठा करुन ठेवावा, असं आवाहन पुणे पालिकेकडून करण्यात आले होते. पण नाराज पुणेकरांनी हा निर्णय प्रत्यक्षात येण्याआधीच बदलून टाकला आहे.


पुढील भागांवर पडणार होता प्रभाव


पर्वती MLR टँक परिसरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठेत, पर्वती HLR टँक परिसरातील सहकार नगर, पद्मावती, बिब्वेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनागर, गंगाधाम, चिंतामणी, पर्वती LLR टँक परिसर
पुणे शहरातील सर्व पेठा, दत्तावाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट येथे पाणीकपात होणार होती. 


SNDT MLR टँक परिसरातील एरंडवणे, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी, सहवास सोसायटी परिसर, चतुर्शृंगी टँक परिसरातील औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, लष्कर जल केंद्र परिसरातील लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी आणि वडगाव जल केंद्र क्षेत्रातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज भागात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. तो मागे घेण्यात आला आहे.