Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: "बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटना देशभरात वारंवार घडतात. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. आज संजय राऊत यांना सामनाच्या अग्रलेखातही लिहिलं आहे. एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नाही त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे. "देशात कुठेही अशी घटना घडता कमा नये. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात लवकरात लवकर खटला चालवावा. मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असो किंवा इतर माध्यमातून असो," असंही उद्धव ठाकरे 'मातोश्री' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.


शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी सरकारची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काही वर्षांपूर्वी निर्भया कांड झालं होतं. आरोपी पकडले, गुन्हे सिद्ध झाले. मग किती वर्षांनी फाशी दिली त्यांना? यासाठी जबाबदार कोण? गुन्ह्यांसाठी गुन्हेगार जबाबदार असतात. तसेच त्याचा न्यायनिवाडा करुन शिक्षेला दिरंगाई करणारेही जबाबदार धरले पाहिजेत. हे जर झालं तरच अशा गोष्टींना आळा बसले," असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. "मी एवढं सांगेल की अशा घटनांचं राजकारण करता कामा नये. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. त्यामुळे. आमचे सरकार गद्दारांनी पाडले म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक आणून या बलात्काऱ्यांना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.


भाजपाचा उल्लेख करत केली कारवाईची मागणी


"मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे. मात्र, मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही. कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. "वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता मुक्त आहे. त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे आता यात भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? संपूर्ण जग आता बघत आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


नक्की वाचा >> Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?


...तरच आपण म्हणून शकतो की...


"कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणे गायब होणे परवडणारे नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्याला लाडकी बहीण आणि मुलींबद्दल आदर आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.