Mumbai Water Cut: मुंबईसह राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बरसला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळं मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. सोमवार दिनांक 29 जुलैपासून पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. धरणांतील साठ्यात सोमवारी एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाणी कपात बंद करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. दरम्यान, सातही धरणांमध्ये मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. 


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी 4 जलाशये तुडुंब भरली आहेत. तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर अशी चार धरणे भरुन वाहू लागली आहेत. या चार धरणांमध्ये 98.66 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सातही धरणांत सध्या 77 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबई महानगर पालिकेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ६६. ७७ टक्के इतका झाला आहे. २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९,६६,३९५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ६६. ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ७,९८,७०४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ५५.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.


पुण्यातही मुसळधार


पुण्यात काल रात्रीपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासला धरण 100 %भरले आहे. धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यातून जवपास 9 हजार 445 क्युसिक ने पाणी सोडण्यात आले आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे