अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, मुंबई  : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात चांगलीच जुंपली होती. या दोन्ही आमदारांमध्ये वादाची थिनगी पडली होती. मात्र आता हा वाढता वाद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कोर्टात पोहचला आहे. या दोन्ही आमदारांच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. दोन्ही आमदारांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. (dcm devendra fadnavis will try to solve dispute in mla ravi rana and bacchu kadu at varsha bunglow)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीसाठी आमदार राणा आणि कडू वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. तर फडणवीसही पोहचले आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


नक्की प्रकरण काय?


कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही राणांनी केला होता. या आरोपानंतर कडूंनी आक्रमक होत राणांना आव्हान दिलं होतं. "राणा एका बापाचा असेल तर त्याने पुरावा द्यावा. जर केलेला आरोप खरा ठरला तर त्याच्या घरी भांडी घासेन", अशा शब्दात कडूंनी राणांना आव्हान दिलं होतं.


या दोन्ही आमदारांनी एकमेकांवर पातळी सोडून टीका केली होती. या आमदारांच्या वादाकडे राज्याचं लक्ष होतं. त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मध्यस्थीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळतो की वाद आणखी वाढतो, हे लवकरच स्पष्ट होईल.