मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. पडळकरांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने आंदोलन केलं, तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजपनेही पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पडळकर यांच्या या वक्तव्यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे आदरणीय आहेत, पडळकर यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. 


'गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अवमानकारक आणि अयोग्य आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मानणारा आहे. एकमेकांचा आदर करणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पडळकर यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं,' असं आठवले म्हणाले.


'शरद पवार आणि आम्ही राजकीय दृष्ट्या वेगळे आहोत. त्यांच्या सोबत मी नाही. माझी राजकीय युती भाजप सोबत आहे. आमचे पक्ष वेगळे असले, तरी मी नेहमी शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद  पवार यांचे योगदान मोठे असल्याने त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे चुकीचे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेवर कलंक लावणारे आहे', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.