मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ५२ वर कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्याचवेळी पाच रुग्ण बरेही झालेत. मात्र,  कोरोनाचा फैलाव झालेल्या महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. असे असले तरी रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संदेश देताना हा निर्णय जाहीर केला. महामुंबईमध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरंही बंद राहणार आहेत. महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. 


राज्यातल्या रेशन दुकानांना तीन महिन्यांचे पुरेल इतके धान्य, कांदे, बटाटे देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही सवलती स्थानिक प्रशासनालादेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे खर्च होऊन शकलेला निधी वाया जाणार नाही यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


दरम्यान, राज्यातल्या जनतेने लग्न, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी करू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठीकरण्यात आलेल्या उपाययोजना बाबत भावनिक मुद्दे आणून अडथळे निर्माण करू नये, असेही आवाहनही त्यांनी केले.