मुंबई : Mumbai Rains : राज्यात चांगला पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात सकाळी जोरदार पाऊस (Mumbai Rains) झाला. ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत होता. सध्या तुरळक पाऊस आहे. रेल्वे आणि रस्ता वाहतूक सुरळीत सुरु आहे. वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुढील 48 तास महत्त्वाचे आहे. मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्याता आला असून गोदावरीकाठच्या रहिवाशांचा स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. तर पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू, 200 जनावरं दगावली आहेत. बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला तर उस्मानाबादमध्ये पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली आहे.


मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून पालघरसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास महत्वाचे आहेत. 



मुंबईत आज सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, मलाड आणि दहिसरमध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले, आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. कांदिवली, मलाडमध्ये पावसामुळे रस्त्यावरची दृश्यता कमी झाली, आणि त्यामुळे रस्त्यावर गाड्या धीम्या गतीने जाताना पाहायला मिळाल्या. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची परिस्थितीही अशीच काहीशी होती.