दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज ठाकरे यांचा मनसे पक्ष येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केलेत. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडं नागडं केलं. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे.


याबाबत पुढे बोलताना परब म्हणाले, हे काय चाललंय ती वेगवेगळी समीकरणं असतील तरी मुंबई महापालिका निवडणुकीला आम्ही समर्थपणे समोरं जाऊ आणि मला विश्वास आहे आम्ही निवडणुकी जिंकू.  महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का या प्रश्नाला बोलताना परब म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणूक कशी लढवली जाणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख बसून याबाबत चर्चा करतील. पण मुंबईत शिवसेनेला वेगळी निवडणुकीची तयारी करावी लागत नाहीत.  आम्ही नेहमीच हे काम करत असतो. शिवसेना हा पक्ष निवडणुकांसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. 365 दिवस काम करणारा हा पक्ष आहे, असं सांगत अनिल परब यांनी भाजपलाही टोला लगावला आहे.