मुंबई : महाराष्ट्रातील मोठे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पण आता मनसेने राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र रक्षक पथक बनवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ज्या वरुण देसाई यांना धमकी काय तर कोणी गुदगुल्या ही करणार नाही. त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.' अशी टीका त्याने शिवसेनेवर केली आहे. 'आम्ही मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास समर्थ आहोत. २००८-०९ साली राज ठाकरेंना मारण्यासाठी युपी बिहार मधून एक तरुण बंदूक घेऊन आला होता हे ही सरकारने लक्षात ठेवावे.' असं देखील मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.


आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी मनसेची आज राज्यस्तरीय महत्वाची बैठक होत आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील या बैठकीस उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.


वांद्रे इथल्या एमआयजी क्लब येथे सकाळी ११ वाजता मनसेची ही बैठक होत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संदीप देशपांडे, किर्तीकुमार शिंदे आणि अन्य पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.