मु्ंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज जयंती आहे. मनसे कडून आज शिवजयंती मोठ्या उत्साहात मुंबईसह महाराष्ट्रात साजरी केली जातेय. शिवाजीपार्कवर शिवजयंती उत्सव ढोल ताशांच्या गजरात साजरा केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीला उपस्थित राहात शिवाजी पार्क मैदान इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ दिली. 



राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली शपथ
शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व जण इथे शिवतिर्थावर जमलो आहोत,  आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करु.


हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्यव्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, तांडे, पाडे, सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, 


कामगारांना न्याय मिळेल, यासाठी जे पडेल ते करु, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्वाभिमानी, स्वाबलंबी, स्वराज्यचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू,आम्ही महाराजांचे मावळे आहोत, आम्ही महाराजांचे सैनिक आहोत, याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही, हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो, आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो, 


अशी शपथ यावेळी राज ठाकरेंनी सर्व मनसैनिकांना दिली.