मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी (Curfew) लागू केल्यानं हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार (Hotel, Resutarant, Bar) व्यावसायिकांचं मोठं नुकसान (60 Lakhs job affected)  होणार आहे. याबाबत आहार संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. ख्रिसमसचा आठवडा असल्यानं २४,२५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी दीड वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याची विनंती आहाराचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सरकारला केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी या तीन दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु असतात. ख्रिसमसचा आठवडा हा रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार व्यावसायिकांसाठी सर्वात अधिक कमाई करून देणारा आठवडा असतो. मात्र यंदा कोरोना असल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान होणार आहे. 


कोरोनामुळे आधीच या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जर सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उशीरपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असती तर व्यावसायिकांची नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली असती. नव्या वर्षात या व्यवसायिकांना नवसंजीवनी मिळाली असती असं आहार संघटनेचे म्हणणे आहे.

मुंबईत जवळपास २२ हजार हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. हा व्यवसाय जवळपास ६० लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतो. ख्रिमसच्या आठवड्यात सर्वाधिक कमाई या व्यावसायिकांची होते. हा व्यवसाय शेतकरी आणि व्यापारी यांच्याशीदेखील निगडीत आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अनेक वर्गांवर होणार असल्याचं या व्यवसायिकांचं म्हणणे आहे. तर कोविडसाठी सरकारनं ताब्यात घेतलेल्या काही हॉटेल्स मालकांना अजूनही सरकारकडून पैसे मिळालेले नाहीत. यामुळेही काही व्यावसायिक नाराज आहेत.