मुंबई : महाराष्ट्रात वय वर्ष १८ ते ४५ या दरम्यान बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी ठाकरे सरकारने ( thackeray government ) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सेवायोजन कार्यालयाकडे ४५ लाख बेरोजगार युवक-युवतींची नोंद आहे. तर, नोंदणीकृत नसलेल्या बेरोजगारांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसेंदिवस बेरोजगारीमुळे वाढत आहे. मात्र, बेरोजगार व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबियांचा मानसिक छळ, कुटुंबाची उपासमार होत आहे. उपजीविकेसाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता असूनही कमी क्षमतेचे काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक तरुण गैर मार्गाकडे वळत आहेत.


त्यामुळे अशा व्यक्तींना नोकरी मिळेपर्यंत त्यांच्या किमान गरजा भागविण्यासाठी त्यांना दरमहा रुपये ५,००० आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता शासनाने नियमावली ठरवली आहे.


बेरोजगार व्यक्ती कोण?


रोजगार नसलेली परंतु रोजगार मिळावी अशी इच्छा असलेली व्यक्ती, रोजगार मिळविणेसाठी आवश्यक ते प्रयत्न करूनही रोजगार न मिळालेली व्यक्ती


बेरोजगारीचे प्रकार


खुली बेरोजगारी : काम करणेची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल अशी बेरोजगारी


हंगामी बेरोजगारी : शेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


अदृश्य/प्रच्छन/छुपी बेरोजगारी : आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्य / प्रच्छन्न / छुपेपणे बेरोजगार असतील.  


कमी प्रतीची बेरोजगारी : एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / कार्यक्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागणे अशी बेरोजगारी


सुशिक्षित बेरोजगारी : सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हाची बेरोजगारी


संरचनात्मक बेरोजगारी : उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी


बेरोजगारी भत्ता देणेबाबत नियमावली


बेरोजगार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा अधिक नसावे. अर्जदाराने राज्याच्या सेवायोजन केंद्रात नाव नोंदविणे आवश्यक, अशी नाव नोंदणी झालेल्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत तिला नोकरी मिळालेली नाही अशी व्यक्ती. किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी/उच्च माध्यमिक/पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर इतकी असावी. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.


बेरोजगार भत्ता देणेची योजना


पात्र बेरोजगार व्यक्तीला दरमहा रुपये ५,००० इतका भत्ता देणेची योजना राज्य शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविण्यात येणार, योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवर एक केंद्र उभारणार, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक शाखा, प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये एक उपशाखा स्थापन होणार.


बेरोजगारी भत्ता शाखेची कामे


बेरोजगारी भत्त्यांसाठी आलेले अर्ज स्वीकारून भत्त्यांसाठी पात्रता आहे किंवा नाही हे तपासणे. जिल्ह्याच्या सेवायोजन विभागात नोंदणी झालेल्या व्यक्तीला नाव नोंदणी दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत ज्यांना नोकरी मिळाली नाही अशा बेरोजगार व्यक्तींची यादी मागवून त्यांची नोंद करणे. जिल्ह्यातील बेरोजगार व्यक्तींची अद्यावत यादी तयार करणे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून प्रस्ताव मान्य झाल्यानंतर ज्यांना बेरोजगार भत्ता देण्यात येईल अशा व्यक्तींची नावे संबंधित जिल्हाधिकारी / तहसीलदारांना कळविणे.


साधनांच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला ५,००० रुपये फक्त एवढ्या रकमेचा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.


बेरोजगार भत्ता बंद होणे 


भत्ता मिळणाऱ्या प्रत्येक बेरोजगार व्यक्तीनी नोकरी मिळाल्यानंतर त्वरित तालुक्यातील/ जिल्ह्यातील बेरोजगारी भत्ता शाखेला कळविले पाहिजे. त्यानंतर हा भत्ता बंद करण्यात येईल. 


तर होईल ही कार्यवाही


नोकरी लागलेल्या व्यक्तीने तशी माहिती न देता भत्ता मिळविणे सुरूच ठेवून शासनाची फसवणूक केल्यास त्या व्यक्तीला ३ वर्षापर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपये इतका दंड होऊ शकेल.


नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी मिळालीय. त्यामुळे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊन याचा लाभ सुमारे ४५ लाख बेरोजगार युवक/युवतींना होणार आहे.