मुंबई : Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठांना फोन केला तर ही लढाई थांबेल. तसेच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखं मोठं मन दाखवायला हवं, याच्यातून चांगला मार्ग निघावा हीच अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण चिन्हही जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ही लढाई कोर्टात सुरु आहे. कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल त्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन ठाकरेंनी पदाधिका-यांना दिल्याची माहिती मिळत आहे. नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा असंही आवाहन ठाकरेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


तसेच एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.तसंच उद्धव ठाकरेंच्या गटानं विधानसभेच्या कामकाजालाही आव्हान दिलंय. ज्याठिकाणी नवीन सभापती निवडले गेले आणि त्यानंतर बहुमत चाचणी घेतली गेली, ही बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे ठाकरे गटाचं म्हणणंय.