Uddhav Thackeray Slams BJP Modi Shinde: 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कलानगरच्या चौकामध्ये ओपन जीपमधून सर्मथकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे, निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी आपण खचलेलो नाही असं सांगतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलं. तसेच पंतप्रधानांच्या नावाने महाराष्ट्रात मतं मिळत नाही म्हणून त्यांना बाळासाहेबांचा मुखवटा लावून राज्यात यावं लागतं असा टोलाही उद्धव यांनी लगावला.


मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा लावून यावं लागतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"यांना (शिंदे गटाला) ठाकरे नाव पाहिजे, बाळासाहेबांचा चेहरा हवा पण ठाकरे कुटुंब नकोय. आपल्यावर आरोप केले की मोदींचं नाव वापरुन मतं मिळवली. तेव्हा आमची युती होती. एका जमाना जरुर होता जनता मोदींचा मुखवटा घालून सभेला येत होती. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतंय. ही बाळासाहेबांची ताकद आहे. आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं नाहीत. त्यांना बाळासाहेबांचा मुखवटा लावून यावं लागतं हा आपला विजय आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगाला आहे. तसेच शिंदे गटावर टीका करताना, "महाराष्ट्राच्या जनतेला माहितीय मुखवटा कोणता आणि खरी शिवसेना कोणती हे माहिती आहे," असंही उद्धव यांनी म्हटलं


मशाल निशाणी सुद्धा काढून घेतील


"ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीने हे कपट आणि राजकारण करतायत हे आपली मशाल निशाणी सुद्धा काढू शकतील. ज्यांनी धनुष्यबाण चोरलं ते मर्द असतील तर तुम्ही धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या मी मशाल घेऊन येतो बघू महाराष्ट्र कोणाच्या बाजूने उभा राहतो," असं उद्धव यांनी म्हणताच उपस्थित समर्थकांनी 'उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है'च्या घोषणा दिल्या.


मी खचलेलो नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर...


"धनुष्यबाण पेलायला सुद्धा मर्द लागतो. रावणाने सुद्धा शिव धनुष्य पेलायचा प्रयत्न केला होता पण काय झालं उताना पडला. चोर आणि चोरबाजाराचे मालक हा शिव धनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे "मी खचलेलो नाही. मी खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या तकदीच्या जोरावर उभा आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत असे कितीही चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना सगळ्यांना निवडणुकीमध्ये गाडून हा शिवरायांचा भगवा त्यांच्या छाताडावर फडकवण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे," असं म्हणत उद्धव यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहा असं सांगितलं.


यापूर्वी कधीच मूळ चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेलं नाही


"कदाचित उद्या मी फेसबुक लाइव्ह करेल. आपल्याला काय काय सांगितलं होतं आणि आपण काय काय केलं ही मी सांगेन. गेल्या 75 वर्षात असं कधीही झालं नव्हतं. काँग्रेस फुटली होती तेव्हा सुद्धा चिन्ह दुसऱ्या गटाला दिलं नव्हतं. समाजवादी पार्टीच्या वेळेसही दावा सोडला गेला म्हणून ते चिन्ह टिकलं. जयललिता यांचा वाद मिटला म्हणून त्यांना चिन्ह मिळालं. मात्र दोन गटात वाद असतात तेव्हा मूळ चिन्ह कधीच दिलेलं नाही. मात्र पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी हेच केलं आहे," असं उद्धव म्हणाले.


मी काही देऊ शकत नाही


"लढाई सुरु झाली आहे. माझ्या हातात आता काहीही नाही. मी काही देऊ शकत नाही. मी एवढच सांगतोय की शिवसेनेचा संयम पाहिलेला आहे. शिवसेनेचा राग पाहू नका," असं उद्धव म्हणाले. पुढच्या सूचना मी तुम्हाला देईल, असंही उद्धव यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.