मुंबई: भाजपने कोणाचेही तिकीट कापलेले नाही, फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि राजपुरोहित या भाजपच्या बड्या नेत्यांची तिकीटे का कापण्यात आली, असा सवाल विचारण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे नेत्यांची तिकीट कापलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी फक्त दुसऱ्या कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. पक्षात अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात. काहीजण विधानसभेत असतात तर काहीजण विधानसभेबाहेर राहून पक्षाचे काम करतात, असे फडणवीस यांनी सांगितले. 


भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट


भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या मंत्रीपद भुषविलेल्या नेत्यांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे या सगळ्यांचे पत्ते कट झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


मुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला


दरम्यान, यापैकी एकाही नेत्याने बंडखोरीचे निशाण फडकावलेले नाही. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश मान्य करून कामाला लागा, असा सल्ला खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर विनोद तावडे यांनीही माझे तिकीट कापल्यामुळे प्रचारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले. फक्त निवडणूक झाल्यानंतर मला यामागील कारण समजून घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले.