योगेश खरेसह अमित जोशी, झी मीडीया मुंबई :  उद्यापासून म्हणजे शनिवारपासून 3 दिवसाच्या जीएसटीनिमित्त विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. जीसएटी केंद्रात मंजुर झाले असल्यानं आणि सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यानं राज्यात जीएसटीबाबात चर्चा करत मंजुर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी विरोधकांबरोबर शिवसेनेनेही पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा काढल्यानं भाजपाची डोकेदुखी कायम रहाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा चाौथा आणि शेवटचा टप्पा नुकताच कोकणांत पार पडला. संपूर्ण यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. जीएसटी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक घेत पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाजपा सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले होते. तेव्हा हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हे आहेत. 


एकीकडे विरोधकांनी भाजपा सरकार विरोधांत कंबर कसली असतांना सत्तेत असलेल्या शिवसनेनेही कर्जमाफी मुद्द्यावरुन नाशिकला शेतकरी अधिवेशन घेत वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. त्यात शेतकरी मुद्द्यावरुन विविध आंदोलने करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सेनेला साथ दिली आहे.


जीएसटी अधिवेशनमध्ये राज्यातील कर आकारणीबाबत चर्चा होत राज्यातील जीएसटी मंजूर केला जाणार आहेत, तसा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी आत्मम्हत्या या मुद्दयांचे पडसाद हे या अधिवेशानत उमटणार हे नक्की. भाजपा पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सेनेची समजुत घालतो का, विरोधकांचा सामना कसा करतो यावर यापुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.