मुंबई : रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाचे दोन नमुने आज दिवसभरात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री महाडमध्ये कोसळलेल्या पुलाची पाहणी करत असताना रायगडचे पालकमंत्री म्हणून मिरवणारे प्रकाश मेहता मागे उभे राहून चक्क सेल्फी काढत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्फी काढत असताना प्रकाश मेहता झी मीडियाच्या कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होते.२२ प्रवाशांना सावित्री नदीच्या पुरात जलसमाधी मिळाली होती. घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.  पाहणी सुरू असतानाच्या क्षणी बचाव पथकाला कोणतंही यश आलं नव्हतं. त्याचवेळी घटनास्थळी उशीरा आलेले पालकमंत्री काय करत होते. तर सेल्फी काढण्यात मग्न होते. 


झालेल्या अपघाता इतकाच पालकमंत्र्यांचा हा सेल्फी प्रकार महाराष्ट्राला हादरवणारा होता. हे होतं ना होतं तोच प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणा पुन्हा एकदा जगासमोर आला. 


पत्रकारावर आरडाओरड आणि दमदाटी


एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर हेच प्रकाश मेहता एवढे संतापले की त्यांनी आरडाओरडा करत पत्रकाराला दमदाटी केली. पत्रकारावर झडप घालून पत्रकाराला दमदाटी करण्याची आरेरावी हे पालकमंत्री प्रकाश मेहता करत होते. या दोन उदाहरणांवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्याची उत्तरही तिथल्या तिथे मिळाली. 


पालकमंत्री काय करतायत, सेल्फी काढतायत... पालकमंत्री काय करतायत... दमदाटी करतायत, पालकमंत्री काय करतायत, पत्रकाराच्या अंगावर झडप घालतायत... पालकमंत्री काय करतायत... अपघाताच्या ठिकाणी उशीरा जातायत, पालकमंत्री काय करतायत, एकूणच घटनेच्या संदर्भात असंवेदनशीलता दाखवतायत. असं होणार असेल तर अशा व्यक्तीला कशासाठी म्हणायचं पालकमंत्री.... ? असा सवाल उपस्थित होत आहे.