World Cup 2023: शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने 7 विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून कधीही न हरण्याचा रेकॉर्ड अबाधित राहिला आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकपमध्ये 8 व्यांदा भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) संतापला होता. यावेळी त्याने पाकच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 


पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या टीमला पुन्हा एकदा भारताविरुद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये 7 विकेट्स राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या टीमची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र त्यानंतर टीमच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही आणि अवघ्या 191 रन्सवर पाकिस्तानची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली. 


खराब कामगिरीवर संतापला बाबर आझम


वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून आठव्यांदा पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) खेळाडूंवर नाराज होता. 'आम्ही चांगली सुरुवात केली आणि काही चांगली पार्टनरशिपही केली. आम्ही सामान्य क्रिकेट खेळून भागीदारी करण्याचं नियोजन केलं होतं, मात्र अचानक विकेट्स पडल्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने डाव संपवता आला नाही,' असं बाबर म्हणाला. 


यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर


"आम्ही ज्या पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली त्यानुसार आमचं लक्ष्य 280-290 असं होतं. परंतु सलग विकेट्स गमावणं आम्हाला महागात पडलं. आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलो. नवीन बॉल घेऊनही आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. रोहितने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती एक उत्कृष्ट खेळी होती. आम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न केला, पण तसंही होऊ शकलं नाही.


भारताचा 8-0 चा रेकॉर्ड अबाधित


आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानवर 8-0 असा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आतापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकूण 8 वेळा आमने-सामने आले आहेत. यावेळी एकदाही पाकिस्तानला भारताला पराभूत करणं शक्य झालेलं नाही. यंदाही रोहित सेनेने हा रेकॉर्ड अबाधित ठेवला आहे.