मुंबई : सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं दिमाखात 'महिला क्रिकेट वर्ल्ड कप'च्या फायनलमध्ये धडक मारली. २००५ नंतर भारतानं पहिल्यांदाच फायनल गाठण्यात यश मिळवलं. आता भारताचा फायनलमध्ये यजमान इंग्लंडशी मुकाबला असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल गाठण्यासाठी भारताला तब्बल एक तप म्हणजे १२ वर्ष वाट पहावी लागली. मिथाली राजच्या टीमनं करोडो भारतीयांचं स्वप्न अखेर सत्यात उतरवलं. 


ज्या ऑस्ट्रेलियानं २००५ मध्ये भारताचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. त्याच कांगारुंना मिथालीच्या टीमनं धुळ चारत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. 


हरमनप्रीत कौरच्या धुवाँधार नॉटआऊट १७१ रन्सच्या जोरावर भारताचं वर्ल्ड कप फायनलचं स्वप्न साकार झालं. भारतीय टीमनं कांगारुंसमोर विजयासाठी २८२ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना भारतीय बॉलर्ससमोर त्यांनी सपशेल लोटांगण घातलं.


ऑस्ट्रेलियन टीम २४५ रन्सवरच ऑल आऊट झाली. झुलन गोस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवनं आपल्या बॉलिंगनं कांगारुंना चांगलचं अडचणीत आणलं. 


टुर्नामेंटच्या सुरुवातीपासून डिफेंडिंग चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियन टीम विजयासाठी हॉट फेव्हरिट होती. तर भारतीय टीम अंडरडॉग्ज होती. मिथाली राजनं आपल्या धूर्त नेतृत्वानं आपल्या टीमला फायनल गाठून दिली. आता फायनल जिंकत भारतीय टीम पहिल्यांदाच  वर्ल्ड कपवर आपंल नाव कोरण्यास सज्ज असेल.