दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमाच्या सुरूवातीपासूनच दमदार खेळी करणार्‍या दिल्ली कॅपिटलने अंतिम सामन्यात प्रवेश करत प्रथमच इतिहास रचला आहे. क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीने प्रथम फलंदाजी केली आणि 3 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ 8 विकेट गमावून 172 धावा करू शकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनने 78 रन करत महत्त्वाची खेळी केली. कगिसो रबाडाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 विकेट घेत दिल्ली संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला होता.


या हंगामात दिल्लीचा प्रवास खूपच अस्थिर राहिला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजयासह या स्पर्धेला सुरुवात करणार्‍या दिल्लीने 16 गुण मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सलग चार पराभवानंतर संघाला प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका होता. संघाने शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.


या हंगामात मुंबई संघ चॅम्पियनप्रमाणे खेळला आहे. 14 पैकी 9 सामने जिंकून संघाने प्लेऑफमध्ये 18 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीविरुद्ध 57 धावांनी जिंकल्यामुळे सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश झाला.


विजेतेपद जिंकण्यासाठी आता दिल्ली आणि मुंबई यांच्यातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. सलग दुसऱ्या आणि पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य मुंबईचे असेल, तर दिल्लीकडे पहिल्यांदा आयपीएलची ट्राफी जिंकण्याची संधी असेल.