भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांकडून एकच जल्लोष सुरु होता. हातात तिरंगा घेऊन लाखो भारतीय रस्त्यावर उतरले होते. दुसरीकडे सोशल मीडियावरही फक्त या विजयाचीच चर्चा सुरु होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी मेसेज करुन भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन आणि एक्सवर पोस्ट शेअर करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


यादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची ही भन्नाट पोस्ट व्हायरल झाली आहे. याचं कारण त्यांनी भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांचं मन दुखावल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी आयुष्यभरासाठी शिक्षाही सुनावली आहे. 



पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?


"ब्रेकिंग न्यूज: दक्षिण आफ्रिकेचं मन दुखावल्याबद्दल भारतीय गोलंदाज दोषी आढळले आहेत. शिक्षा: अब्जावधी चाहत्यांकडून आजीवन प्रेम," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.


विराट आणि रोहितची निवृत्तीची घोषणा


सामना जिंकल्याने एकीकडे संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा होत असतानाच विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. चाहते यातून सावरत असतानाच कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आपण आता भारतीय संघासाठी टी-20 खेळणार नाही असं जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. 


भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना संघाला शेवटच्या क्षणी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. हेनरिक क्लासेन याने 27 चेंडूत 52 धावा ठोकत संघाला विजय हातात आणून दिला होता. पण तळाच्या फलंदाजांनी तो आक्रमकपणा न दाखवल्याने प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज असतानाही त्यांना 7 धावांनी पराभव स्विकारावा लागला. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीसह सूर्यकुमार यादव यानेही जबरदस्त झेल घेतल विजयात मोलाचा वाटा उचलला. तसंच विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय फलंदाजीत मोठं योगदान दिलं.