Amrish Puri Death Anniversary: ...तर अमरीश पुरींऐवजी 'हा' अभिनेता दिसला असता 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत

'मिस्टर इंडिया' चित्रपटाचं 60 टक्के शुटींग पूर्ण झाल्यानंतर खलनायक बदलण्याचा निर्णय घेण्यामागे एक विशेष कारण होतं असं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं

Updated: Jan 12, 2023, 10:58 AM IST
Amrish Puri Death Anniversary: ...तर अमरीश पुरींऐवजी 'हा' अभिनेता दिसला असता 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत title=
mogambo amrish puri (Photo- YouTube Screengrab)

Amrish Puri Death Anniversary: मनोरंजन सृष्टीमध्ये जेवढं महत्त्व मुख्य भूमिका साकारणारा अभिनेत्याला असतं तितकेच महत्त्व खलनायकालाही असतं. खलनायक हा दमदार नसेल तर चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांवर फारसा पडत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक खलनायक होऊन गेले ज्यांचं केवळ नाव घेतलं तरी त्यांनी साकारलेल्या भूमिकांची यादी डोळ्यासमोरुन जाते. अशाच खलनायकांमध्ये अमरीश पुरी यांचं नाव आघाडीवर आहे. आपल्या अभिनय कौशल्याने कोणत्याही भूमिकेला जिवंत करणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक सकारात्मक भूमिकाही केल्या. मात्र त्यांचं नाव प्रामुख्याने व्हिलन म्हणजेच खलनायक म्हणून घेतलं जात. २००५ साली आजच्याच दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजी अमरीश पुरी यांचं निधन झालं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्यांनी अजरामर केलेल्या 'मोगॅम्बो' या भूमिकेबद्दल...

पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये नापास

अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 साली पंजाबमध्ये झाला होता. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या अमरीश पुरी यांनी १९६७ ते २००५ दरम्यान चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं. त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. अमरीश हे त्यांच्या पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये अपयशी ठरले होते. त्यानंतर त्यांनी पृथ्वी थिएटरमधून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी 70 च्या दशकामध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 1982 साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घाईंच्या 'विधाता' चित्रपटामध्ये पहिल्यांदाच अमरीश पुरी मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसून आले. आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी साकारलेल्या अनेक खलनायकी भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.

आधी अमरीश पुरी नाही तर अनुपम खेर होते 'मोगॅम्बो'

अमरीश पुरी यांचा चित्रपटामधील वावर प्रेक्षकांनाही हवाहवासा वाटू लागला. 1987 मध्ये जेव्हा अनिल कपूर आणि श्रीदेवीची मुख्य भूमिका असलेल्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटामधून अमरीश पुरी 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत पहायला मिळाले. 'मोगॅम्बो खुश हुआ' या आपल्या संवादाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे की या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर यांची निवड झाली होती. (anupam kher was first choice for role of mogambo) त्यांनी चित्रपटाचं शुटींगही सुरु केलं होतं. चित्रपटाचं जवळजवळ 60 टक्के शुटींग पूर्ण झाल्यानंतर शेखर कपूर हे खलनायकाच्या कामासंदर्भात समाधानी नव्हते. त्यामुळे अमरीश पुरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. अमरीश पुरी यांना ही भूमिका अधिक शोभून दिसेल असं वाटल्याने थेट त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर शेखर कपूर यांनी 'मोगॅम्बो'ची भूमिका अमरीश पुरींना दिली. या चित्रपटामधील त्यांचा अभियन, डोळे मोठे करुन बोलणं आणि 'मोगॅम्बो खुश हुआ' हा संवाद त्यावेळी फारच गाजला.

अमरीश यांनाही वाटलेलं आश्चर्य

अमरीश पुरी यांचं आत्मरचित्र 'दि अ‍ॅक्ट ऑफ लाइफ'मध्ये त्यांनी या सर्व घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. आपल्यालाही शेखर यांच्या निर्णयामुळे आश्चर्य वाटलं होतं, असं अमरीश यांनी पुस्तकात म्हटलं आहे. चित्रपटाचं अर्ध्याहून अधिक शुटींग पूर्ण झालेलं असताना शेखरला अचानक माझी आठवण कशी झाली असा प्रश्न अमरीश यांना पडला. बोनी कपूर यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये या बदलासंदर्भात भाष्य केलं होतं. जावेद यांनी ज्या पद्धतीच्या खलनायकाचा उल्लेख केला होता त्यासाठी केवळ अमरीश पुरीच योग्य व्यक्ती होते. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक शुटींग झाल्यानंतरही खलनायकाची भूमिका सारकारणारा अभिनेता बदलण्याचा निर्णय घेण्यात आला, असं बोनी कपूर म्हणाले.

६० दिवसांमध्ये उरलं शुटींग

अमरीश पुरी यांनी 60 दिवसांमध्ये या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं. या चित्रपटाच्या शुटींगसाठी पाच वेगवेगळे सेट तयार करण्यात आले होते.